नवी दिल्ली : भारत पहिल्यांदाच विजेचा निर्यातदार देश ठरला असल्याची माहिती केंद्रीय वीज प्राधिकरणाने दिली आहे. २०१६-१७ या वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारताने सुमारे ५७९८ दशलक्ष युनिट वीज नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि भूतानला निर्यात केली आहे. गेल्या तीन वर्षांत नेपाळ आणि बांगलादेशला निर्यात होणाऱ्या विजेत लक्षणीय वाढ झाली आहे.
ऐंशीच्या दशकापासून भारताने सीमेपलीकडे विजेचा व्यापार सुरू केला. भूतानकडून विजेची आयात होत होती, तर नेपाळला अतिशय कमी प्रमाणात वीजनिर्यात होत होती. गेल्या वर्षभरापासून नेपाळला होणाऱ्या वीजनिर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. बांगलादेशालाही सध्या भारतातून सहाशे मेगावॉट वीज निर्यात केली जाते. नेपाळला होणाऱ्या वीजनिर्यातीत लवकरच वाढ होईल, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.